कल्हईवाला येत नाही याची आठवणही आजवर कधी झाली नव्हती..मग त्याच्या न येण्यानं हळहळण्याचा प्रश्नच नव्हता..किती सहजपणे विसरून गेलो त्याला..हे विस्मरणही विस्मरणातच गेले होते..एक काळ बघता बघता बदलला होता..संपला होता..
कल्हईवाला आज दिसला तरी..उद्या दिसणार नाही..आणि असा कोणी कल्हईवाला होता याची जाणीवही कोणाला राहणार नाही..काळाच्या ओघात काय काय गमावून बसतो आहोत आपण आणि तरीही आपला माज काही सुटत नाही..
डोळ्यांपुढे सारी नश्वरता दिसूनही अमरत्वाची हौस काही केल्या फिटत नाही..संगणकावर नको असलेल्या गोष्टी डीलीट करून आपण रिसायकल बिनमध्ये टाकून देतो..त्या पुन्हा रिस्टोर करता येतात..पण आयुष्यात अशी सोय मात्र उपलब्ध नाही..इथं जे डिलीट झालंय..होणारेय..ते कायमचंच नाहीसं होणार आहे..
का कुणास ठाऊक त्या कल्हईवाल्याच्या चेह-यात मला माझाच चेहरा दिसला आणि मी थरारलो..पण मग शांतही झालो..मी काही अपवाद नाही..सा-यांची शेवटी हीच गती होणार आहे..सा-यांचीच.

No comments:
Post a Comment