या चार ओळी प्रत्यक्षात उतरवणं किती कठीण असतं
याचा अनुभव अनेकदा घेतला आहे मी. त्यातली अलीकडची एक गोष्ट म्हणजे इंग्रजी कादंबरी
लेखन. मराठीला जागतिक पातळीवर न्यायचं असेल तर मराठी साहित्य इंग्रजीत अनुवादीत
होण्याला पर्याय नाही. मी स्वतः सगळीकडे याचा उच्चार करीत असतो. प्रत्यक्षात
मराठी-इंग्रजी अनुवादाची आपल्याकडे अत्यंत वाईट अवस्था आहे. शेवटी माझ्या एका
कादंबरीचा (मोघ पुरुस) इंग्रजी अनुवाद (द थाऊजंड ब्लुम्स) करण्याचं मी ठरवलं.
मागील तीन महिन्यात झटापट केल्यानंतर एकदाचा हा अनुवाद पूर्ण झाला आहे. मी स्वतः
जे इतरांना सांगत फिरतो ते शेवटी मी करू शकलो याचा आनंद आहे. ही कादंबरी प्रकाशित
होण्यासाठी ती आता देशी व परदेशी प्रकाशकांकडे मी पाठवणार आहे. कोणत्याही
वशिल्याशिवाय, भेदभावाशिवाय ही कादंबरी विचारात घेण्यात येईल आणि तिचे जे काही
गुणदोष असतील त्यानुसार तिचं भवितव्य जे ठरेल ते ठरेल. माझ्यासाठी हा पुढचा टप्पा
अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याला टर्निंग पॉईंट म्हणतात तसं. तसं तेठरू शकेल किंवा
काहीच होणार नाही. कधीतरी आपल्याला सारं आयुष्य पणाला लावावं लागतं माझ्याबाबतीत
ती वेळ या कादंबरीसाठी आली आहे. त्यामुळेमाझ्यापुरता एक निर्णय मी घेतला आहे. ही
कांदबरी माझ्यासाठी खूप विशेष आहे. त्याचा जो विषय आहे त्यावर लिहिल्याशिवाय मी
इतर कोणत्याही लिखाणाकडे जायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. दुसरं असं की ही कादंबरी
प्रकाशित नाही झालीच तर यापुढे काहीही मी लिहू शकणार नाही. कारण अन्य सर्व गोष्टी
याच्यापुढे नगण्य आहेत. त्या फार तर माझ्या लिखाणाची हौस भागविणा-या गोष्टी ठरतील.
त्यामुळे त्या लिहिल्या नाही गेल्या तरी त्यानं काही मला फारसा फरक पडणार नाही.
त्यामुळे ही कादंबरी प्रसिद्ध झाली नाही तर तो एकप्रकारचा लेखन सन्यासच असणार आहे.
मी स्वतः ती प्रसिद्ध करू शकतोच पण त्यात काही अर्थ नाही. मी स्वतः कोणताही खर्च न
करता, माझ्या अटींवर, इतरांना ती पसंत पडली तरच मला ती प्रसिद्ध व्हायला आवडेल.
आता हे सारं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे काही गोष्टी लोकांच्या साक्षीनं
झालेल्या ब-या असतात. आज मी जे लिहिलंय त्याच्या विरोधात मी वागू लागलो तर हा
पुरावा तरी राहिल. थोडक्यात काय तर कादंबरी प्रसिद्ध झाली तर माझ्यासकट सर्वांचाच
फायदा. पण नाही झाली तर वाचकांची माझ्या लिखाणातून सुटका होईल. माझाही स्वतःच्या
लिखाणाबद्दल असलेला भ्रमाचा भोपळा फुटेल आणि काही व्यावहारीक गोष्टींकडे मी जास्त
लक्ष देऊ शकेन. तुर्तास हे इतकंच.
हेन्री मिलरनं रिम्बाँ या कवीबद्दल द टाईम ऑफ द
असॅसिन्स नावाचं अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे. महेश एलकुंचवारांनी केलेला त्याचा
मराठी अनुवाद सध्या लोकसत्तेच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत असतो.
रिम्बाँ, मिलर या दोघांशीही मला स्वतःचं नातं जाणवतं. हे असं जाणवतं तेव्हा कलावंत
हा कोठेही असला की त्याच्या वेदना या जवळपास सारख्याच असतात याची पुन्हा जाणीव
होते. त्यात मिलरनं रिम्बाँच्या पुस्तकाबाबत लिहिलं आहे- When he was
writing his ‘nigger book’ ( Une Saison en Enfer – the season in hell), Rimbaud
is said to have declared: “My fate depends on this book!” How profoundly true
that statement was not even Rimbaud himself knew. As we begin to realize our
own tragic fate, we begin to perceive what he meant. He had identified his fate
with that of the most crucial epoch known to man. Either, like him, we are
going to renounce all that our civilization has stood for thus far, and attempt
to build afresh, or we are going to destroy it with our own hands. When the
poet stands at nadir the whole world must indeed be upside down. If the poet
can no longer speak for society, but only for himself, then we are at the last
ditch.
मिलरला उशीरा का होईना पण मान्यता मिळाली. त्याची बरीचशी स्वप्नं
पूर्ण झाली. रिम्बाँ मात्र वयाच्या ३७ व्या वर्षी गँगरीन होऊन परक्या देशात परक्या
लोकांच्या सहवासात भणंग अवस्थेत मरण पावला. इतकंच.

No comments:
Post a Comment