Sunday, May 28, 2017

अन्नदात्यांचा संप

येत्या १ जून पासून राज्यातील काही भागांतील शेतकरी संपावर जाणार आहेत. शेतकरी संपावर जाणं ही विलक्षण गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा ती दूर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही. आणि त्याला ते नाही तर आपणच जास्त जबाबदार आहोत. ज्याच्यामुळे आपण जीवंत आहोत त्याला जीवंत राहण्यासाठी आपण कधीही गांभीर्यानं विचार केला नाही. इतर अनेक उद्योगांसारखा शेती हा देखिल एक उद्योगच आहे असं समजणं आणि शेतक-यांना इतर कामक-यांसारखाच दर्जा देणं यांतून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आपण यांतला फरक लक्षात घेतलेला नाही. आपण मोबाईल, कार्स, कपडे, घर, सिमेंट, खेळणी यांच्याशिवाय जीवंत राहू शकतो पण अन्नाशिवाय जीवंत राहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली तर मात्र या संपाचं काय महत्त्व आहे ते कळू शकतं. शेतीच्या अवस्थेला कोण जबाबदार आहेत हा वेगळा भाग आहे पण या शेतक-यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे व त्यात आपण मागे पडतोय यात शंका नाही. आपण शेतीला तुच्छ लेखतो, मळकट पायजमा-शर्टातल्या मेहनती शेतक-याला आपण अपमानास्पद वागणूक देतो, त्याच्याशी बोलणं आपल्याला आपल्या प्रतिष्ठेच्या आड येतं, शेतीचं महत्त्व आपण ओळखू शकत नाही. या सर्व गोष्टी बदलण्याची वेळ आली आहे. महत्त्व मेहनतीला असतं, कपड्यांना नसतं. ऊनवारापावसांत जमिनीची मशागत करून आपल्यासाठी पिक-भाजीपाला पिकवणा-या या शेतक-यांना कमी लेखणं म्हणजे प्रत्यक्ष आयुष्याला कमी लेखण्यासारखं आहे. शेती व शेतक-यांना नाकारणं म्हणजे जगण्याला नाकारणं. ते होऊ नये ही इच्छा. हा संप टळेल न टळेल पण आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि पुन्हा कधी त्यांच्यावर ही वेळ न येवो यासाठी आपण सारेच प्रयत्न आणि प्रार्थना करूयात.

No comments:

Post a Comment