असहिष्णूतेच्या
काळात लेखकांनी शांत बसायला नको असं आग्रही प्रतिपादन कन्नड लेखिका वैदेही यांनी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन समारंभात केलं. महाराष्ट्रात त्यांनी असं
प्रतिपादन केल्याला अनेक अर्थ आहेत. गुजराथनंतर काही प्रमाणात महाराष्ट्र संघाची
प्रयोगशाळा ठरते की काय असं वाटण्याची अनेक उदाहरणं इथं गेल्या काही वर्षांत घडली
आहेत. करा, बघा आणि वाट पाहून पुन्हा करा, असा काहीसा प्रकार सध्या सुरू आहे.
धार्मिक संस्था व व्यक्तिंचा वाढता बडेजाव, उद्दाम सामाजिक संघटनांचा विखारी
प्रचार, साहित्यिकांची केली जाणारी पद्धतशीर हेळसांड, सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात
अत्यंत खालच्या पातळीवर जाण्याची तयारी, याने राज्यानं वातावरण ढवळून निघालं आहे.
काहींना यात मात्र काहीच वावगं वाटणार नाही. विरोधक उगाच बोंबा ठोकतात असं सर्व
भक्त मंडळींचं लाडकं मत असतं. ते तसे का बोलतात हे समजून घेण्याची मात्र त्यांची
कधीच तयारी नसते. पण सर्व सामान्य माणसांनी असली अक्षम्य चूक करण्यात शहाणपणा
नाही. नाहीतर त्यांची त्या बेडकासारखी गत होईल ज्याला एका पाण्याच्या भांड्यात
ठेवून त्याच्या खाली आग लावून त्याचं तापमान हळूहळू वाढवण्यात आलं. त्या उबदार
पाण्याची सवय त्याला झाली आणि आपण काही काळानं यातच उकळून मरूही शकतो ही जाणीवच
त्याला झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा उशीर झालेला होता. तेव्हा वैदेही सांगतात
तसं आपण शांत न बसता आपल्याला जे लहान सहान चटके आत्ता बसताहेत त्यांच्या विरोधात
आत्ताच आवाज करणं गरजेचं आहे. नाहीतर आग लागून आपण कधी भस्मसात होऊ ते आपल्याला
कळणारही नाही. तेव्हा मौन सोडा आणि व्यक्त व्हा.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment